आशिया खंडातील सर्वांत मोठी पुस्तक जत्रा अशी ओळख असलेली दिल्लीची ‘जागतिक पुस्तक जत्रा’ अर्थात ‘वर्ल्ड बुक फेअर’ म्हणजे पुस्तकप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. पुस्तक दिनानिमित्ताने या जत्रेबद्दल थोडेसे...
..............
आशिया खंडातील सर्वांत मोठी पुस्तक जत्रा अशी ओळख असलेली दिल्लीची ‘जागतिक पुस्तक जत्रा’ अर्थात वर्ल्ड बुक फेअर म्हणजे पुस्तकप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. दिल्लीच्या प्रगती मैदानावर ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ (एनबीटी) आणि ‘भारत व्यापार संवर्धन संस्था’ (आयटीपीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ही पुस्तक जत्रा आयोजित केली जाते. साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान या वार्षिक जत्रेचे आयोजन असते. दर वर्षी ही पुस्तक जत्रा एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असते. यंदा म्हणजेच जानेवारी २०१७ मध्ये भरलेल्या २५व्या पुस्तक जत्रेची संकल्पना ‘मानुषी’ अशी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये स्त्री साहित्याला प्राधान्य दिले गेले होते. महिलांद्वारे लिहिल्या गेलेल्या आणि स्त्रियांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा यात प्रामुख्याने समावेश होता.
१८ मार्च ते चार एप्रिल १९७२ या कालावधीत पहिली पुस्तक जत्रा भरली होती. त्या वेळी २०० पुस्तक प्रकाशनांनी यामध्ये सहभाग घेतला होता. देशात कोलकाता येथे होणाऱ्या पुस्तक जत्रेनंतर देशातील दुसरी जुनी पुस्तक जत्रा अशीही या जत्रेची ओळख आहे. देशभरातील पुस्तक प्रकाशन संस्थांना चालना देणे इतकेच या पुस्तक जत्रेचे उद्दिष्ट नसून, यामार्फत ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या वतीने राष्ट्रीय वाचक धोरणाला चालना दिली जाते. शिवाय इतर देशांमध्ये आपली पुस्तके पोहोचवण्याच्या दृष्टीनेही यामध्ये प्रयत्न केले जातात. या पुस्तक जत्रेदरम्यान प्रामुख्याने एनबीटी आणि नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन्स लिटरेचर (एनसीसीएल) यांच्या वतीने मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांच्या साहित्याला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी वाचक तयार करणे हा त्यामागील उद्देश.
राजकीय घडामोडींचे देश पातळीवरील केंद्र अशी ओळख असलेल्या दिल्लीत वर्षातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये जणू सांस्कृतिक मेजवानी असते. दिल्लीला ऋतूंचे भान आहे, जाण आहे. या शहराबद्दल कितीही प्रतिकूल मत असले, तरी दिल्लीचा शिशिर ऋतू हा नेहमीच आकर्षणाचा ठरणारा असतो. ‘दिल्ली की सर्दी’ किंवा ‘दिल्लीचा हिवाळा’ ही एक वार्षिक सांस्कृतिक पर्वणी असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. हिवाळा आला की नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने देशाची ही राजकीय राजधानी सांस्कृतिक स्वरूप धारण करते. याची सुरुवात होते नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याने. पंधरा दिवसांच्या या मेळाव्यातून विविध राज्यांचे अस्तित्व दिल्लीच्या प्रगती मैदानात दिसू लागते. राज्यांच्या आद्य ते खाद्य अशा सर्व संस्कृतींपर्यंत, कला-लोककला, शिल्पकला, हस्तकला यांचे सादरीकरण या निमित्ताने होत असते. उत्सवप्रिय दिल्लीकरांनी याचा लाभ घेतला नाही तरच नवल. त्यानंतर आयोजन असते ते ऑटो एक्स्पोचे. त्यालाही उदंड प्रतिसाद असतो.
पुस्तकांसोबतच होणाऱ्या खाद्यजत्रेलाही गर्दी होते. ही जत्रा पूर्वी द्वैवार्षिक असायची. परंतु जत्रेचे आयोजक आणि नॅशनल बुक ट्रस्टचे प्रमुख एम. ए. सिकंदर यांनी ही जत्रा दर वर्षी भरवण्याचा प्रस्ताव २०१२मध्ये केंद्र सरकारला दिला होता. त्यानुसार मग तेव्हापासून ही भव्य पुस्तक जत्रा दर वर्षी आयोजित केली जाते.